रविवार, ३१ मार्च, २०१९

अडथळा



विजय - वर्गातल्या मोजक्याच हुशार मुलांमधला, मध्यम उंचीचा, गोरा, आणि मितभाषी मुलगा.  कुठल्याही स्कॉलर मुला मध्ये असणारे सगळे गुण ह्याच्या मध्ये.

यथावकाश कॅम्पस सिलेक्शन होऊन एका मोठ्या मल्टि -नॅशनल  कंपनी मध्ये लागला. आता हॉस्टेल ची अडजस्टमेन्ट संपली,आणि मित्रांबरोबर रूम वर राहायची श्रीमंती आली, मोबाईल आला, दुचाकी आली, वीकेंड ला मल्टि-प्लेक्स  मध्ये मूव्ही आली, डोगर-गड वरची भटकंती आली. एकूण काय तर "मज्जा - नी - लाईफ" आली.

पण शेवटी स्कॉलर तो स्कॉलर; त्यामुळे विजय ने पुढे शिकण्यासाठी आणि करणाऱ्या कामात अजून खोल जाण्यासाठी काही ग्रुप्स आणि ऑन -लाईन  फोरम्स चे सदस्त्यव घेतले. त्यातून त्याला जास्तीत जास्त शिकवायला पण मिळाले. त्याच बरोबर त्याने पण त्याचे विचार मांडणे आणि इतरांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे सुरु केले.  त्यामुळे काही लोकांशी त्याचे ई-मेल वर बोलणे पण सुरु झाले. प्रोजेक्ट्स ची देवाण घेवाण वाढली.

त्यातच एक "ईला" होती, कॉलेज च्या शेवटच्या वर्षाला आणि हुशार. दोघांची कधी ओळख संपून मैत्री झाली ते त्यांना पण समजले नाही. दोघेही एकाच शहरात राहत होते पण मैत्री मात्र ऑन - लाईन होती.  दोघांनाही कधी वाटे कि एकमेकांना भेटायला हवे पण "भेट" हे बोलायलाच दोघांना वेळ लागला.

नंतर जेव्हा केव्हा ते भेटण्याचा प्लॅन बनवत, पण कुठे तरी माशी शिंकत.

कधी त्याला ऑफिस मध्ये जास्त वेळ बसून राहावे लागे तर कधी तिला सुट्ट्या म्हणून ती गावी जात. कधी त्याचा मित्रांबरोबर प्लॅन ठरलेला असे तर कधी तिची इंडस्ट्रियल व्हिझिट असे. कधी त्याच्या कडे गावाहून आई वडील आलेले असे तर तिचा व्हाय-वा असे. कधी तिची पी -एल  असे तर तो कधी महिन्यांसाठी कंपनी च्या काम साठी परदेशी.

जवळ-जवळ वर्ष झालेले पण त्यांच्या भेटीला सारखा काही ना काही अडथळा येतच होता.

शेवटी दोघांनीही भेटण्याचा हट्ट सोडला. असेल नशिबात तर भेटू असे ठरवूनच टाकलेले.  कारण प्लॅन करून परत न भेटण्याची सल जास्त लागे.

आता त्यालाही ६ महिने होऊन गेलेले.

आज रविवार होता... होता खरा पण त्याला वेळ न्हवता इतर बरीच कामे असल्याने त्याने मित्रांबरोबर आज भटकंती ला जाणे टाळले.  आज त्याला राहत्या घराचा भाडे करार नूतनीकरण, नवीन स्वयंपाकी, नवीन देशाला जाण्यासाठी त्याचे विझा अँप्लिकेशन, टॅक्स रिटर्न्स असे बरीच कामे करायची होती.

एकंदरच बाकी च्या दिवशी असणाऱ्या कामाच्या बोझ्या मुळे हि कामे करावी लागणार, मित्र बरोबर फिरायला जाता येणार नाही म्हणून स्वारी आधीच जरा नाखूष होती त्यातच घरातून निघणार तोच हेल्मेट ची काच तडकली. टोपी घातली आणि निघाली स्वारी. थोडे अंतर जात नाही तर वाऱ्या मुळे टोपी उडाली...  परत मागे येऊन टोपी घेतली - एकंदर काय तर अजून उशीरच  झाला... आजचा दिवस असा कसा म्हणून वैतागून च निघाला परत - सांगणार तरी कुणाला.

भांडारकर रोड वरची काही कामे केली आणि विझा साठी लागणारे फोटो काढले, कोपऱ्याच्या दुकानातून टॅक्स रिटर्न्स ची झेरॉक्स काढली आणि निघाला परत; पण गाडी कडे येतो ना येतो तोच लक्षात आले कि ओरिजिनल टॅक्स रिटर्न्स ची कॉपी झेरॉक्स दुकानातच राहिली...  झाले चिडलाच स्वतःवर

आजचा दिवसच वाईट म्हणून जरा शिव्या हासडतच दुकानाकडे पळाला. धड-धड,चीड-चीड करत कि ओरिजिनल पेपर्स सापडतील कि नाही. धापा टाकताच दुकानात गेला त्याची कानशिलं तापली होती, आज हेल्मेट नाही म्हणून रस्त्याची सगळी धूळ चेहऱ्यावर होती, त्यात घामाने ती धूळ चिकटवायचे काम उत्तम केले होते.
घाईघाईतच त्याने नुकत्याच आलेल्या ग्राहकाकडे ढुंकून नही बघता, त्याची तमा ना बाळगता, जरा चिडक्या वैतागलेल्या आणि घाबऱ्या आवाजात कागदपत्रांची विचारणा केली.

आणि तेवढ्यात पुढची व्यक्ती एक्दम मागे वळली.  "ईला"

 "ईला" च ती; तो स्तब्धच झाला. हसणे, चिडणे, धडधडणे, बोलणे सगळे सगळेच तो विसरला. त्याला काय होतेय ते त्यालाच समजेना. हसू? कि बोलू? काय करू? कसा दिसतोय? हि इथे कशी? विचारू? काय करू? त्याचा पुतळाच झाला.


तिला भेटून आता ४ तास होऊन गेले. तो एकटाच आणि एकंदरच विचारात गुंग झाला होता. सगळंच दिवस कसा गेला हेल्मेटचा, टोपीचा, ATM च्या रांगेचा अढथळा आला नसता तर...

आजपर्यंत त्यांच्या भेटीला जे अडथळे आले ते आणि आज त्याच अडथळ्यामुळे ते भेटले. २ मिनिटे सुद्धा तिला ऊशीर झाला असता, किव्हा २ मिनिटे सुद्धा तो लवकर गेला असता किव्हा ओरिजिनिअल पेपर विसरलाच नसता तर...  जे घडले ते त्याच क्रमाने, तेवढ्या वेळेसाठीच घडले नसते तर...
 






    

शुक्रवार, १५ मार्च, २०१९

निकाल: पास - गुण: १००%



अंगणात आलेल्या चिमणीची चिव चिव ऐकू येते न येते; ती चिमणी दाणा खाते न खाते; नि लगेच भुरकन उडून जाते ... तसेच काहीसे सुरुची चे झालेले;

अगदी "नववधू प्रिया मी बावरते" असा आणि इतका नवीन संसार ... आता कुठे घर लावायला  सुरवात केलेली.  नवीन म्हणून का होईना पण नवरोबा पण साथ देत होते

अश्याच एके रविवारी हे लक्ष्मी-नारायण तुळशी बागेत गेलेले खरेदीला; आणि तेवढ्यात फोन, पुण्यात काही कामा निम्मत आलेली नवऱ्याची आई-आज्जी चार तासात भेटायला येतेय नवीन जोडप्याला.

नवऱ्याने थोडे हो - नाही करत फोन ठेवला आता उरलेल्या सगळ्या बेतावर पाणी पडणार. संध्याकाळी सारस -बाग, हॉटेल मध्ये जेवण, आणि मग सुजाता ची मस्तानी सगळ कॅन्सल करावे  लागणार आणि बायको पण चिडणार म्हणून त्याचा चेहरा आधीच उतरला...

शेवटी त्याने उरलेली थोडी बोहरी आळीतली खरेदी करावी आणि मग घरी यावे असे त्याला सुचवून म्हणजे जवळ जवळ ठरवूनच  तीने पटकन घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली.

सुरुची तशी छोट्या शहरातून आलेली असली तरी पुण्यातच शिकलेली, त्या मुळे पुण्याची तशी तिला माहिती त्यामुळे त्याला तिने घरी जाण्याविषयी काळजी न्हवती पण ती पुण्यात शिकलेली, नवीन विचारांची, मॉडर्न, स्वतः चे मत ठामपणे मांडणारी, मोकळी आणि  म्हणूनच त्याला हे आई-आज्जी प्रकरणचं टेन्शन आलेले आणि आता काय करणार म्हणून चक्रावलेला. सगळे नवीन तिला कसे जमणार म्हणून त्याचाच जीव खाली वर होत होता...

त्याने कसेतरी पटकन खरेदी केली आणि गेला घरी बिचारा...

घरी बघतो तर काय... घर उत्तम आवरलेले ... वरणभात, भाजी पोळी ,कोशिंबीर वैगरे सगळं सुग्रास स्वयंपाकाची तयारी  त्यात परत आई-आज्जी ला आवडणारा साजूक तुपातला शिरा पण. आणि हीच पुण्यातली मॉडर्न जीन्स आणि टॉप वाली मुलगी साडी नेसून, भाळी कुंकू लावून, केसांचा अंबाडा घालून, गळ्यात फक्त पण
ठशठशीत मंगळसूत्र, केसात फुल आणि हातात बांगड्या घालून तयार. सुरुची चे ते सात्विक आणि लाघवी रुपडं बघून हा तर स्तब्धच झाला कदाचित पुन्हा एकदा तिच्या प्रेमातच  पडला.

तेवढ्यात आई-आज्जी आली.

तिला वाकून नमस्कार, तिची विचारपूस, तिला काय हवे काय नको सगळे सुरुची एकटेच बघत होती. आई-आज्जी चा चहा, संध्याकाळचा दिवा, पूजा, पोथी वाचन, सगळे सगळे घडत होते आपोआपच. दोघेही छान गप्पा मारत होत्या, ती त्यांना आणि त्या तिला समजावून घेत होत्या.

आई-आज्जी ची गोड़, तिखट,आंबट ची पथ्थे, गोळ्या-औषधं तर सगळे तिला जणू माहितीच होते. ते सगळे बघून तर त्यालाच काहीच कळायला मार्ग न्हवता काय आणि कसे चाललेय ते? एकदा दोनदा तर त्यालाच त्याचा घरात नवीन आणि परके आहोत असे वाटले.

जेवण झालीत; अगदी फळं सुद्धा झालीत; आई-आज्जी च्या उशाशी तांब्या-भांडे पण ठेवले. हा इकडे बेडरूम मध्ये वाट बघतच बसला, आणि सुरुची मात्र आई-आज्जी च्या बाजूला झोपली सुद्धा.

सकाळी आई-आज्जी निघाल्या; निघताना नातं-सुनेला जवळ घेतले साडी-चोळी दिली आणि म्हणाल्या

"निकाल: पास -  गुण: १००%"

   

 




       

गुरुवार, २८ फेब्रुवारी, २०१९

बसस्टॉप


बसस्टॉप


सकाळी ९ ची वेळ, बस सुटण्याच्या तयारीत, पराग धापा टाकताच चढला.

गेले तीन महिने तो हेच करतोय; ह्याच बस ने नोकरीला जातोय. उण्या पुऱ्या ३ वर्षाचा अनुभव घेऊन पुण्याच्या मोठ्या कंपनी मध्ये लागलेला. आज उशीर होण्याचे कारण रात्री जरा जास्तच जागरण झाले मित्रांबरोबर. नेहमीचंच गर्दी. एव्हाना तो नेहमीच्या प्रवाशांना , आणि ते त्याला ओळखते झाले होते .

पण आज काहीतरी वेगळे होते त्याला जाणवत होते पण सांगता येत न्हवते. आज काय खास होते बरे ... आज त्याची नजर तिच्या वर पडली आणि पडली काय स्तिरावलीच ... ती बहुदा नवीनच कि जुनी पण आधी कधीही न दिसलेली, गव्हाळ पण गोऱ्यात झुकणारी , दिसायला अगदी साधी पण रेखीव, गर्दीत उठून न दिसणारी पण नीट बघितले तर मात्र सुंदरतेला  सामान अर्थी ... काय नाव असावे तिचे हा प्रश्न त्याला भेडसावत होता ...

दुसऱ्या दिवशी त्याला ऑफिस ला जाण्याच्या घाई पेक्षा बस पकडायची घाई झालेली ... दिसली पुन्हा दिसली .. परत तेच... तसाच भारावला गेला तो...  आणि मूग ती दिसताच गेली आणि तो हरवतच गेला ...  ज्या दिवशी ती दिसली नाही कि तो बस चुकवायचा आणि त्याला बस चुकवायला लागली तर त्याची चिडचिड व्हायची ...

त्याला तिच्याशी बोलायचे होते पण असे अचानक कसे बोलणार आणि त्याही पेक्षा परत दिसलीच नाही  तर.. म्हणून तो जास्त घाबरे. गर्दी मुळे कधी ती उभी तर कधी तो , कधी त्यांच्यात डझन भर माणसे ऊभी तर कधी अगदी मागे पुढे ... अश्यातच त्याला ती  "उत्तरा" असल्याचे त्याला समजले ... त्याला वाटले नावाप्रानेच तिचे दिसणे ... पटकन लक्ष न वेधणारे पण सगळ्याच आयुष्याच्या प्रश्नांची उत्तर असणारी .

तिची निकट काढण्यासाठी तो इतरांना जागा देणे, स्टॉप आला कि मागे पुढे करणे वैगरे क्लुप्त्या करी ... एकदा तर त्यानेच तिला जागा पण दिली पण बोलणे झालेच नाही...  करूच शकला नाही...  करणार तरी काय.

उत्तरा ही त्याच्या साठी असा प्रश्न होता कि त्याने तो सोडवल्या शिवाय त्याच्या जीवनात राम नाही ...

एके दिवशी, ती बस मध्ये पुढे उभी होती आणि तो मागे. तिच्यात आणि त्याच्यात निदान अर्धा डझन तरी माणसे होती,पुढचा स्टॉप अजून बराच पुढे होता, आणि कंडक्टर अजून त्याच्या मागेच होता ... त्यामुळे पुढचा स्टॉप येई पर्यंत तरी काहीच हालचाल करता येणार न्हवती; त्यात गर्दी आणि ती त्याला पाठमोरी होती ... एकंदर सगळं प्रकार बघता त्याचा हिरमोडच झाला होता ... बस सिग्नल ला थांबली, बस चे इंजिन आणि ह्याचे डोके दोघेही सुरूच होते पण चालू असून बस हालत न्हवती आणि ह्याला काही मार्ग सापडत न्हवता... कासावीस झाला होता...
तेवढ्यात पुढे हालचाल झाली, सिग्नलाच काही माणसे उतरली आणि हा पुढे जाण्याआधी तिला जागाच मिळाली आणि तिच्या शेजारी जागा रिकामी होऊन सुद्धा आपल्या ऐवजी दुसऱ्या कुणाला बसायला मिळेल म्हणून ह्याचा अजूनच मूड गेला आणि "श्या!" असे मनातल्या मनात म्हणत आणि नशिबाला लाखोली वाहत ह्याने वैतागून मान दुसरीकडे वळवली.

तेवढ्यात आवाज आला "जरा थांबता का ? माझ्या बरोबर ते आहेत." आता काय? कोण? म्हणून मनाचा हिय्या करून पराग ने आवाजा च्या बाजूला परत मान हलवली ... आणि बघतो तर काय , उत्तरा ने सगळ्या बस मध्ये सगळ्या समोर पराग कडे बोट दाखवत दुसऱ्या इसमाला तिच्या बाजूच्या सीट वर बसायला मज्जाव केला होता आणि सांगितले होते कि तिच्या शेजारी बसायची जागा हि पराग साठी "राखीव" आहे.


आज त्याला वर्ष झाले, म्हणायला काहीच बदलेले नाहीये; बस तीच, प्रवासी तेच, तेच ड्राइवर आणि कंडक्टर, प्रवासी पण तेच, रोजचेच, फरक फक्त एवढाच कि पृथ्वीची सूर्याभोवती एक फेरी पूर्ण झालेली, तिची आणि त्याची अग्नी भोवती ७; त्याचे गणित त्याला सुटलं होतं; त्याला उमगलं होतं  "उत्तरा" सूत्र आणि तिच्या गळ्यात होतं त्याच्या नावाचं मंगळ सूत्र. 


 

  

शुक्रवार, १५ फेब्रुवारी, २०१९

मला भेटलेले संत



मला भेटलेले संत 




आपल्या महाराष्ट्राला खूप मोठी संत परंपरा लाभली आहे. संत तुकाराम, एकनाथ,चोखामेळा, रामदास, ज्ञानेश्वर,नामदेव,सावतामाळी,नरहरी सोनार,जनाबाई,मुक्ताबाई, गोरा-कुंभार इत्यादी; ही सगळी संत मंडळी त्यांच्या त्यांच्या काळात होऊन गेलेली, फार मोठी संत मंडळी; आणि त्यांनी समाजाला भरभरून दिले; त्या जोरावर समाज उभा राहिला, वाढला फळफळला. ह्या थोर मंडळी बद्दल मी बापडा काय ते सांगणार. 

मी आज एका वेगळ्याच संत माहात्म्य बद्दल सांगणार आहे. 

ते मला प्रथम कधी भेटले हे निश्चित सांगता येणार नाही; पण सुरुवातीला कधी रस्त्यावर, कधी दुकानात, कधी मुलांना बगिच्यात खेळायला घेऊन गेलेलो असताना, तर कधी अगदी सिनेमा गृहात सुद्धा भेटले आहेत मला... आणि जसे आचनाक कुठेहीभेटतं,तसे अचानक गायब सुद्धा होतं. 



मला भेटलेले संत

मला भेटलेले संत



मी आश्चर्यच्या धक्यातून आवारात नाही तोच त्यांची दिसण्याची, भेटण्याची वारंवारता वाढली; ते आता दिवसातून बराच वेळ बरोबर असतं; बोलत तर काहीच नसत फक्त मंद स्मित करत; कधी कधी मला ही पण शंका येई की ते माझ्या कडे बघूनच तसे करत कि ते तसेच दिसत; पण एक मात्र खरे कि ते मंद स्मित मला दिसले कि मला पण खूप हायसे वाटे आणि माझा पण पूर्णत्वाचा, समाधानाचा श्वास/उसासा बाहेर पडे. नंतर तर मला अगदीच सवय झाली त्यांची असे म्हणायला हरकत नाही. 

मित्राला सांगितले तर त्याला आश्चर्यच  वाटले की कोण हे असे वैरागी कि जे सिनेमा गृहात,मॉल मध्ये असे कुठेही दिसतात, भेटतात आणि अचानक गायब पण होतात.  त्याला तर खात्री झालेली कि एकतर हा जादूटोणा आहे किव्हा मला वेड तरी लागले आहे; कारण आजच्या ह्या काळात ह्या सगळ्या गोष्टी अशक्यप्राय वाटतात.  

पण पुढे एक दिवस आला;  मला आश्चर्याचा धक्काच बसला मी त्यांच्याशी बोललो असे मला वाटले. मी फक्त "तुम्ही?" असे प्रश्नार्थक नजरेनेच विचारले आणि त्यांनी फक्त स्मित हास्य केले; शब्द ऐकू नाही आले पण मला ते  "हो मी...  कारण तू... म्हणून मी... " असे बोलले असे स्पष्टपणे जाणवले; "तुला हवे तोपर्यंतच मी आहे; तुला हवे तेव्हाच मी येतो आणि तुला नको तेव्हा निघून सुद्धा जातो... " 

मी तर पूर्णपणे बुचकळ्यात पडलो; काहीच समजत न्हवते; डोक्याला कितीही ताण दिला तरीही त्यांच्या बोलण्याचा अर्थ समजत न्हवता; मीच काहीतरी ऐकले; उगाचच आपला भ्रम झाला वैगरे वाटत होते; पण कुठेतरी वाटत होते कि ते खरे सांगत आहेत; पण शहानिशा करणार कशी; माझ्या आयुष्याची आता जवळ जवळ चाळीस वर्ष आलेली; आणि त्या इसमाला; त्या स्मित हास्याला मी कुठेच पाहिलेले जाणवत न्हवते. कुठेच दिसला न्हवता आजपर्यंत का?  कुठे होता इतके वर्षे मग ?

नंतर त्यांचा ठाव ठिकाण शोधण्यापेक्षा त्यांची मला एवढी सवय झालेली होती कि काही कारणामुळे जर ते स्मित हास्य-ती व्यक्ती दिसली नाही कि मी त्यांचा शोध घ्यायचो आणि ते तर म्हणत कि मीच त्यांना बोलावतो आणि घालवतो सुद्धा. 

मला कळायला मार्गच न्हवता पण नंतर जेव्हा ते कधीतरी म्हणाले कि "मी बरोबरच असतो.. आधी पण होतो ... "  मग मात्र मी संभ्रमात पडलो. कळायला काहीच मार्ग नाही, मित्राला सांगितले तर तो म्हणाला  तुझ्या वर पळत ठेवली जात असेल; तुझे कॉलेज मध्ये काही भानगड किव्हा आधी कुणाशी काही भांडण  न्हवते ना !?! मित्राची एकंदर दिशा बघून हा हे किती गंबीर पणे घेतोय ते लक्षात आले आणि कुणाशीच काही बोलायचे नाही ते ठरवले पण मग ह्याचा पत्ता लागायचा कसा? शेवटी मग मी माझ्याच भूतकाळात जायचे ठरवले-अगदी अनोळखी सारखे-मी मलाच आरश्यात पाहत होतो-मी माझाच चित्रपट पाहत होतो...ज्याचा मी हिरो होतो.  

त्या चित्रपटात खरे तर मी किती शहाणा अथवा बावळट होतो; कुठे, किती आणि कसे वागायला चुकलो वैगरे-वैगरे सगळे अगदी लक्ख प्रकाश सारखे समोर येत होते...पण तिथे कुठे हे संत माहात्म्य दिसत न्हवते. खूप विचार केला अगदी विचारानं मध्ये अखंड बुडून गेलो...भूतकाळात एकदा मन गेले कि जपून ठेवलेल्या आठवणी हसु आणतात तर नकोश्या आसू त्यामुळे भूतकाळातून लवकर बाहेर येणे महाकठीण काम...रात्रं न रात्रं जागा असायचो पण भूतकाळ मधल्या झालेल्या गोष्टी / प्रसंग सोडून काहीच आठवत न्हवते आणि हे संत महाशय तर बेपत्ताच!.    

आणि...आणि एका रात्री अचानक मला तो "युरेका" चा क्षण गवसला... (मला ते संत माहात्म्य; कि कारुण्य माउली दिसली ... )


नदी चा उगम दिसला; सुरुवातीला तिचे पात्र लहान होते; उंचावरून धावत येत होती; पाणी कमी पण आवाज जास्त आणि वेग जास्त;त्या वेगामुळे जीवनदायिनी कमी आणि जीव घेणारी जास्त भासली... तसेच तर माझे होते... म्हणतात हा "उथळ पाण्याला खळखळाट फार". 

मला जाणवलेलं, दिसलेलं फक्त माझं होत असे वाटे पण जेव्हा मी माझ्या मित्रांशी ह्या संदर्भात हितगुज केले तेव्हा लक्षात आले कि थोड्या फार फरकाने सगळ्यांचेच असे होते. 

सुरुवातीला अनिश्चिते कढून निश्चितेकडे सरकतांना आपण अगदी  "माय  लाईफ-माय रूल्स" किंव्हा "लाथ मारेल तिथे पाणी काढेल" वैगरे गोष्टी बोलत असतो; आणि त्या मुळेच कदाचित बाहेर जेवायला जाताना माझ्या जोडीदाराने मला हवे असलेले कपडे नाही घातले तर मी रुसणार ; मी जोडीदारासाठी  खूप करतो आणि तो किव्हा ती तसे काहीच नाही करत ची भावना ; त्या वरून रुसवे-फुगवे; त्या मुले जेवण तर राहतेच बाजूला पण तो जेवणाचा आनंद पण मिळत नाही.  मुलांना कुठला ड्रेस चांगला दिसेल ; त्यांची शाळा कुठली क्लास कुठला; ते अगदी घरात सोफा कुठल्या रंगाचा घायचा ते गुंतवणूक कश्यात करायची ह्यातून मतभेत आणि त्यातून रुसवे-फुगवे. त्यात परत सासर-माहेरा फोडणी ती वेगळीच... 

पण आता वयाची जवळ जवळ ४ दशकं उलटायची वेळ आली असताना  नवरा किव्हा बायको "ठीक ! चालेल ." म्हणून आपल्या जोडीदाराच्या प्रस्तावास मान्यता पण देऊन टाकते. मग ती किव्हा तो म्हणतो सुद्धा: "आज-काल तू लागेचस माझं ऐकतोस किव्हा ऐकतेस - आढेवेढे नाही कि वाद नाही ".   खरे तर त्याला ही  आणि तिला ही माहिती असते कि परिस्थिती काही बदलणार नाहीये; पूर्व असू दे कि पश्चिम सभोवताल तेच राहणार आहे; त्यामुळे आहे हि स्तिथी स्वीकारणे आणि पुढे चालावे.  पण  हे शहाणपण वयाचा आकडा पुढे सरकत गेला कि येते; आधी म्हणजे साधारणतः तिशी पर्यन्त परिस्थिती समजावून न घेता मला काय हवाय; मी कसा आणि मीच कसा बरोबर आहे ; मलाच कसे जास्त कळते ; ह्यात सगळे लक्ष असते. पण मग जरा वय झाल्यावर समजते कि त्याचा काहीही उपयोग नाही; आणि परिस्थिती स्वीकारायला हवी.  आणि एकदा का परिस्थिती स्वीकारली कि मग समोरच्याची आपल्याला नव्याने ओळख होते परिस्थिती जशी आहे तशी का आहे ह्याचे आकलन आपोआपच होते; आणि ट्याटू मार्ग काढून पुढे चालत जाणे हा आपल्या जीवनाचा आणि जगण्याचा मार्ग होतो. मुलांनी कमी मार्क्स मिळवले तर त्यांना नीट समजावून सांगणे होते पण ते मध्ये आपण नाही किव्हा आपण त्यांच्या जागी परीक्षेला जाणार नाही - ज्याचे त्याचे त्यालाच करावे लागते हे समजते ...  जोडीदार आपल्याशी वागताना चुकला तर आपण सोडून देतो; आपण चुकलो तर मना पासून सॉरी म्हणून पुढे सरकतो आणि त्याला आपलेसे करून आपण त्याचा होऊन जातो 

ह्या स्टेज ला नोकरीचे, पदोन्नती  चे समीकरणं  नसतात, खूप पैसे कमाईची घाई आणि इच्छा नसते , नवीन गाडी , नवीन घर नको असते  मला काय हवे ह्या पेक्षा जोडीदार, मुले , आपले पालक म्हणतात तसे आपण करून मोकळे होतो - का? तर त्यांना आनंद मिळावा म्हणून.. इच्छा एकाच असते ह्या सगळ्या मागे कि जे आहे जसे आहे तसेच चालू राहू दे . 

आता नदीचे पात्र विस्तीर्ण झालेलं  असते ; पाणी आता संथ , शांत , असते पण खोल असते  ; ती आता जीवनदायिनी,जीवन-धारणी  झालेली असते 

... आणि अश्या वेळी ते संत माहात्म्य भेटतात ...  आपण एक दिवस आरश्या समोर उभे असतो; त्यात आपण आपल्यालाच बघत असतो ; आणि अचानक आपल्याला ते संत माहात्म्य दिसतात  ; आणि नंतर जेव्हा जेव्हा आपण परिस्तिथी चा स्वीकार करून; त्या शांत सखोल आणि विस्तीर्ण पात्र असलेल्या नदी प्रमाणे असतो तेव्हा तेव्हा ते संत माहात्म्य दिसत असतात आणि स्मित हास्य करत असतात...   



  


















रविवार, २० जानेवारी, २०१९

चहा की कॉफी !?!


चहा की  कॉफी ?



चहा की कॉफी ? तसा अगदी वरवर चा आणि साधा वाटणारा हा प्रश्न बघितलं तर गहन आहे. 

चहा की कॉफी हा प्रश्न आधी कोंबडी की अंडी  ह्या सारखा अनादीकाळा  पासून चालत आलेला नसला तरी बराच जुना आहे; निदान इतका तर नक्कीच कि ह्या चहा आणि कॉफी च्या आधी गूळ-पाणी होते ह्याचा सुद्धा लोकांना विसर पडला असेल. 

तर चहा आणि कॉफी हि पेयं कानामागून आलीत आणि  "तिखट" ऐवजी  "गोड" झालीत असे म्हणायला हरकत नाही; आणि हे कधीपासून तर भारतीय इंग्रजळ्या पासून... बाकी भारतीयांचं इंग्रजळणं हे जंगली घोड्याला पाळीव बनवण्या इतकंच पुण्य कर्म होतं हे अजूनही काही गोऱ्यांना  (तिकडच्या आणि इकडच्या सुध्दा) वाटते... असो.  तसा तो विषय वेगळा - तो कधी तरी घेऊ तूर्तास चहा की कॉफी... 

बाकी हा प्रश्न साधा पण उत्तर देणाऱ्या विषयी बरेच काही सांगून जातो; उत्तराने तर हवे असलेले पेयं  (अर्थात चहा किंव्हा कॉफी - ह्या पैकीच एक काहीतरी - उगाच वाचकांनी आपल्याला हवी असलेल्या इतर पेयांची अपेक्षा करू नयें) हवय हे समजते पण ते नक्की कसे हवय हे पण समजते. उदाहरणार्थ   "चहा !!" अस स्पष्ट उत्तर मिळाले तर समजावे कि चहा हा कडक आणि फक्कड हवा आहे आणि तशीच स्पष्टोक्ती कॉफी च्या बाबतीत झाली तर जरा "स्ट्रॉंग" हवी असा अर्थ असतो . 


Coffee or Tea
Tea or Coffee


चहा घेणारी व्यक्ती कधी कॉफी घेत नाही आणि कॉफी घेणारी चहा... जिथे लोक प्रसंगानुरुप दोघे घेतात त्या वरून त्यांना एका विशिष्ट शहराचे रहिवासी - अर्थात "पुणेरी" म्हणतात... कारण तिथला नियम- "फुकट ते पौष्टिक". 

बाकी खुद्द पुण्यात चहा मिळतच नाही, मिळते ते "अमृततुल्य" आणि अमृततुल्य ला चहा म्हणणे म्हणजे राजा-ला-रंक, साहेबा-ला-नौकर, आणि पॉलिटिशियन-ला-सेवक म्हणण्या सारखी दुर्बुद्धी असण्या सारखे आहे.... आणि ती तसे म्हणणारी व्यक्ती दुसऱ्या जगातून पुण्यात आलेली आहे; आणि पुण्यात आलेली आहे - अवतरलेली नाही  म्हणून पुणेरी नाही हे सिद्ध होते.   "दुसऱ्या जगातून"  ह्या साठी म्हणालो कारण पुण्यात "जगात" भारी असे "बरेचं" अमृततुल्य आहेत . 

अरेच्चा ती कॉफी मागेच राहिली की   - 

हो  "ती" कॉफी आणि "तो" चहा... माणसांचे खरेतर, बाई आणि माणूस असे वर्गीकरण न करता चहा आणि कॉफी असेच करावे असे वाटते  - एकतर  चहा चे कॉफी सारखे, कॅपचिनो, एक्सप्रेसो,लाटे,फिल्टर  वैगरे असे विविध प्रकार नसतात; ती कोल्ड पण असते पण  तो गरमच (आणि तसाच चांगला लागतो.); बरं त्याच्या कडे तिच्या सारखी वस्र विविधता नसते; तो लिहायला आणि वाचायला सुद्धा सोपा; तिला वाचायचे म्हणजे परिश्रमच. दुसरे दोघांचे  मूळ स्वभावच वेगवेगळे. उदाहरणार्थ : एखाद्या व्यक्ती ला शिंक आली आणि त्या व्यक्ती ने आजूबाजूचा ४ ते ५ फुटाची जागा हातवारे हलवत, जोरात आवाज काढून शेवटी काहीतरी शिवी वजा शब्द उच्चरले कि ते - "चहा" व्यक्तिमत्व. या उलट जर व्यक्ती ४ वेळा शिंका देतेय आणि त्याही हळू-हळू त्यातही मान आणि जास्तीत जास्त हात हलवते ते कॉफी व्यक्तिमत्व. 

तर असे ते, तो आणि ती जेव्हा भेटतात, तेव्हा टपरी जाते आणि कॅफे येतो ; ४ वेळा कट मारणारा तो; एक एक घोट पित ४ तास बसतो. एका शिवीत आणि एका शिटीत सगळे सांगून मोकळे करणारा तो तासंतास शब्ध शोधत असतो. तीही मोकळी होते. तिलाही त्याची उर्मी भावते आणि गर्मीची उब हवी हवीशी वाटते. 

शेवटी त्याचं आणि तिचं शुभमंगल वाजलं कि लोक भेटायला येतात आणि त्यांना ते दोघे अगत्यानं विचारतात: "चहा की  कॉफी?"  



अडथळा

विजय - वर्गातल्या मोजक्याच हुशार मुलांमधला, मध्यम उंचीचा, गोरा, आणि मितभाषी मुलगा.  कुठल्याही स्कॉलर मुला मध्ये असणारे सगळे गुण ह्याच्या ...